दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
बारामती: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांचा संप सुरू असल्यामुळे सर्व प्रवासी वाहतूक ठप्प पडली आहे.त्यामुळे लॉकडाउनपासून बंद असलेली बारामती पुणे रेल्वे सेवा लवकर सुरू करा. जर या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार न करता रेल्वे प्रशासनाने जर ताठर भूमिका घेऊ नये, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या कार्यालयात आगळेवेगळे आंदोलन करेल असा इशारा 'मनसे'पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
याबाबत मनसेने रेल्वे प्रशासनाला पत्र दिले आहे. नियमितपणे पुणे - बारामती प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची मागणी आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व महाराष्ट्रासहीत देशभरात वेळोवेळी पुकारण्यात आलेला लॉकडाउन यामुळे गेल्या वर्षभरापासून रेल्वेसेवा बंद आहे. ही बंद करण्यात आलेली पुणे- बारामती नियमित असणारी रेल्वे सेवाही तत्काळ सुरू करण्यात यावी. प्रवाशांना दिलासा द्यावा या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक व बारामतीचे स्टेशन अधीक्षक यांना पत्र देण्यात आले.
महाराष्ट्र सरकारने देखील कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना रेल्वे प्रवासाची मुभा दिलेली आहे. तरीदेखील मध्य रेल्वे प्रशासन अद्यापही पुणे - बारामती रेल्वे सेवा सुरू करत नसल्यामुळे दररोज पुणे बारामती प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे रेल्वे सुरु न झाल्या आंदोलन करण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बारामती तालुकाअध्यक्ष अॅड. नीलेश वाबळे, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. पोपटराव सूर्यवंशी, शहर उपाध्यक्ष स्वप्नील मोरे, अॅड. भार्गव पाटसकर, गोकुळ केदारी, प्रीतम तपकिरे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.